प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर : शेतकऱ्यांची सध्याची बिकट परिस्थिती, शेतीसमोरील अडचणी आणि ग्रामीण भागातील वास्तव जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने “देऊळ बंद 2” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी शेतकरी प्रश्नांवर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असूनही आज अनेक संकटांना सामोरे जात आहे.
शेतीमालाला योग्य भाव, वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा वेळी समाजाने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस उत्तम नाना अमृतराव, श्रीधर जाधव, धनू रोजकरी, बगडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेतकरी हितासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.
चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण वास्तव आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
