प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली असून, जुन्या भांडणाच्या कारणावरून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना दि. 03 मे 2026 रोजी मध्यरात्री 00.10 वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जय मेडिकल समोर घडली.
मृत तरुणाचे नाव कृष्णा अनंत रसाळ (वय 19 वर्षे, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे असून, आरोपी प्रथमेश कांबळे व प्रसाद रोचकरी (दोघे रा. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम कृष्णा रसाळ याला शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर, खांद्यावर व पोटावर वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे वडील अनंत महादेव रसाळ (वय 49 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. 04 मे 2026 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
