धाराशिव : ८ मार्च International Women’s Day निमित्त मानवी हक्क अभियान च्या वतीने महिलांच्या सुरक्षेसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, जागतिक महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय समानतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर साजरा केला जातो. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला असून महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या घटना वाढत असल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली.
महिलांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना त्यांच्या अधिकारांचा स्वतंत्रपणे वापर करता यावा यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. अनेक ठिकाणी महिला पदाधिकाऱ्यांच्या कामकाजात त्यांच्या पती किंवा कुटुंबीयांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी मानवीहक्क अभियानाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, जिल्हा कार्याध्यक्ष खालीद पटेल, जिल्हा सचिव मोहन ताटे, जिल्हा संघटक शिवाजी कांबळे, धाराशिव तालुका अध्यक्ष जनार्धन वाळवे, तुळजापूर तालुका अध्यक्ष तानाजी खांडेकर आणि उमरगा तालुका अध्यक्ष शिवकांत गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांच्या हक्कांचे संरक्षण व सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली.
धाराशिव : जागतिक महिला दिनानिमित्त मानवीहक्क अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
