प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. १७ ऑगस्ट २०२६ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील नागरिकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे खानापूर परिसरात काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला बळ मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून महागाई, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्ट व्यवस्था तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडत आहे. या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत शंकर मधुकर सुतार, कुमोद संभाजी पवार, कांतीलाल जाधव, अनिल गरड आणि पांडुरंग गरड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, प्रकाश रामचंद्र घायतीडक यांची धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा पक्षप्रवेश व नियुक्ती कार्यक्रम धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा सरचिटणीस गोरोबा झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला.
यावेळी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या नागरिकांचे तसेच नवनियुक्त तालुका सचिव प्रकाश रामचंद्र घायतीडक यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत करून अभिनंदन केले. काँग्रेसची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
खानापूर परिसरातील नागरिकांनी काँग्रेसवर व्यक्त केलेला विश्वास आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी काळात जनतेच्या विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय राहतील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास; खानापूरच्या नागरिकांचा जाहीर पक्षप्रवेश, प्रकाश घायतीडक यांची तालुका सचिवपदी नियुक्ती
