प्रतिनिधी : प्रतीक वाघे
भुम : भुम तालुक्यातील बावी येथे एका ४१ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भुम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बावी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विलास काशीनाथ भोसले (वय ४१, रा. अंबिका नगर, बावी ता. भुम जि. धाराशिव) यांनी दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.५४ ते ७.१५ वाजण्याच्या सुमारास बावी शिवारातील विश्वनाथ भोसले यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी मयताचा मुलगा प्रसाद विलास भोसले (वय २२) यांनी दि. २५ मे २०२६ रोजी भुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी तळ्यातील पाण्याची मोटार नेत असल्याचे विलास भोसले यांचे छायाचित्रण केले. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व फोटो इतरांना दाखवत मोटार चोरी केल्याचा आरोप करून गावात बदनामी केल्याचे म्हटले आहे.
या सततच्या मानसिक त्रासाला आणि बदनामीला कंटाळून विलास भोसले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी विश्वनाथ दिगंबर भोसले, लालु प्रकाश भोसले, प्रकाश विश्वनाथ भोसले, बाबु मारुती पिंपळे आणि उमेश रोहीदास राउत (सर्व रा. बावी ता. भुम जि. धाराशिव) यांच्याविरोधात भा.न्या.सं. कलम १०८, ३५६, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास भुम पोलीस करीत आहेत.
