प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्र. ८ व १४ येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा खर्च केवळ औपचारिक कार्यक्रमांवर न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी राहुल गांधी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला.
विज्ञानवादी आणि प्रगतिशील भारताच्या निर्मितीचा विचार घेऊन पुढे जाणारे नेतृत्व म्हणून उपस्थितांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या शिक्षकवृंदांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, प्रशांत पाटील, राजेंद्र शेरखाने, मा. खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, नगरसेवक अझर पठाण, मेहबूब पटेल, धनंजय राऊत, अंकुश पेठे, अभिषेक बागल, वसंत मडके, बाबा मोमीन, सरफराज काझी, पोपट शिंदे, खालेद पटेल, जावेद काझी, आरेफ मुलानी, अज्जूभाई, नियमात महदी, मुईब शेख यांच्यासह नगर परिषद शाळा क्र. ८ व १४ चे मुख्याध्यापक नईम सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
उपस्थितांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अभिनंदन करण्यात आले.
